आमदार डॉ. विश्वजीत कदम यांना वाढदिवस बळ देऊन गेला !
दत्ता पवार
युध्दात आणि राजकारणात बळाचं महत्व सर्वार्थानं थोर गणलं जातं. असंच बळ आमदार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना मिळालं. निमित्त होतं त्यांच्या वाढदिवसाचं. वाढदिवसानिमित्त युवकांचा मेळावा पार पडला आणि आमदार साहेबांचं बळ कैक पटीनं वाढलं. त्यांचं बळ कसं वाढलं ते पुढं पाहूया.
राज्याच्या राजकारणात पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ स्फोटक म्हणून गणला जातो. इथं 24 तास राजकारण केलं जातं. राजकारण आणि राजकारण या विषयावर चर्चेचा फड रंगविला जातो. या मतदारसंघाला स्व. पतंगराव कदम यांच्या सारखा द्रष्टा नेता लाभला. मागास भागाचं त्यांनी सोनं केलं. शासकीय आणि संस्थात्मक क्षेत्रातून त्यांनी लोकांचं भलं केलं. त्यांच्या अद्वितीय कामगिरीने हजारो कुटुंबाचं कल्याण झालं. त्यांच्या पश्चात भली मोठी जबाबदारी डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर आली. ते पहिल्यांदा बिनविरोध तर दुसऱ्यांदा 1 लाख 62 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. महाविकास आघाडी सरकारात ते राज्यमंत्री झाले. सत्तांतरात ते विरोधी बाकावर आले. पण विकासकामातील त्यांची गती वेगाचीच राहिली. मागील चार वर्षात त्यांनी 1 हजार कोटींचा विकासनिधी मतदारसंघात खर्ची केला. त्यांच्या विकासाभिमुख कार्याने मतदारसंघ जाम बांधला आहे.
2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं वर्ष आहे. निवडणुकांची रणनीती आणि विस्तारावर सर्वच पक्षांचा भर आहे. देव-धर्माच्या आड निवडणुका होणार यात शंका राहिली नाही. भावनेला हात घालत मतांची बेगमी केली जाणार आहे. सोबतीला दडपशाही आहे. या वावटळीत आपला गड भक्कम करण्यावर आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा भर आहे. मागील यशाचा त्यांच्यावर दबाव आहे. मागील वेळेपेक्षा नेटकं यश संपादण्यावर त्यांचा भर आहे. तशी तयारीही त्यांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून युवक काँग्रेसचा मेळावा जिल्हा काँग्रेसने आयोजित केला होता.
मेळाव्याला देशभरातून काँग्रेसचे फायर ब्रँड नेते आले होते. यात कन्हैय्या कुमार आणि खासदार मोहम्मद इम्रान प्रतापगडी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी मेळाव्याला आक्रमकपणे संबोधित केले. त्यांच्या भाषणांचा मोठा प्रभाव युवक कार्यकर्त्यांवर पडला आहे. युवक कार्यकर्ते जोशात आहेत. याचा सकारात्मक परिणाम निवडणुकांतून दिसून येणार आहे. एकूणच आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी घट्ट बांधलेल्या मतदारसंघाला बळकटी मिळाली हे नक्की !